जलद, कार्यक्षम प्रशासनासाठी ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम.
जलद, कार्यक्षम प्रशासनासाठी
‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम.

अकोला, दि. ३ : नागरिकांच्या अडीअडचणी, प्रश्नांचा मागोवा घेऊन त्यांचे वेळीच निराकरण व्हावे यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रभावी समस्या निवारण प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक जलद, कार्यक्षम होणार आहे.
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (इज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाज अचूक, गतिमान व कार्यक्षम करण्यावर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची व्यवस्थित नोंद ठेवली जाणार असून, व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी मदत होणार आहे.
प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये
या प्रणालीमुळे नागरिक, अर्जदार यांचा तपशील, त्यांच्या अडचणी प्रणालीत नोंदवल्या जातील. नागरिकांचा प्राथमिक तपशील. फेस स्कॅनिंग आदी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल. त्यांच्या सर्व भेटींची नोंद डिजिटल स्वरूपात साठवली जाईल जेणेकरून त्यांच्या समस्येवर प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा मागोवा घेता येईल. भविष्यातील संवाद अधिक सोपा होईल.
एखादा नागरिक आपली अडचण घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आला तर यापूर्वी तो केव्हा आला होता, कोणत्या कारणासाठी आला होता आणि त्याच्या समस्येवर अद्यापपर्यंत कार्यवाही का झाली नाही याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सहज पाहता येईल. त्यामुळे समस्येचा थेट पाठपुरावा करता येईल. समस्या सोडविण्याबाबत नोंद जिल्हाधिकारी हे या प्रणालीमध्ये करतील. यामुळे समस्येची सोडवणूक होण्याबरोबरच, पुनरावृत्ती होणाऱ्या तक्रारी वेळीच हाताळता येतील.
या प्रणालीमुळे नागरिकांचे प्रश्न आणि शंका यांना जलद गतीने उत्तर मिळेल. जिल्हाधिकारी नागरिकांचे समस्या जाणून घेतल्यानंतर त्वरित निर्णय घेऊन संबंधित अधिकारी यांच्याकडे या प्रणालीद्वारे कार्यवाहीसाठी पाठवतील. यापूर्वी ही प्रक्रिया प्रत्यक्ष कागदपत्रे पाठवून केली जात होती, त्यामुळे अधिक वेळ लागत असे. आता ही प्रक्रिया वेगवान होईल आणि नागरिकांचे प्रश्न अल्पावधीत सोडवले जातील.विश्वासार्हता दृढ होईल.
ही प्रणाली प्रशासन आणि नागरिक यांच्यात पारदर्शकता निर्माण करेल तसेच समस्या सोडवण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व जलद होईल. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि लोकांचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केला.